Saturday, April 12, 2025

काटा रुते कुणाला

 मध्यंतरी एक विचार मनात आला.. स्वतःशी खरं असताना . आणि तसे मी ते नेहेमीच असण्याचा प्रयत्न करत आले आहे. पण काही वेळा आपण आपल्याशी प्रकर्षाने खरे असतो.

विचार आला विजेसारखा, मला एकाकी वाटतंय. त्या वेळी. मला खरोखरच एकाकी वाटतंय. फार सुंदर शब्द आहे ना? एकाकीपणा. एकटेपणा. एक जाणीव ज्या मध्ये आपल्याला अचानक लक्षात येतं की आपण एकटे आहोत. एकटे आलो ह्या जगात आणि एकटे जाणार ही, ह्या जगातून निघून.  हे झालं
निर्वस्त्र सत्य.. एकटे असणे .. म्हणजे अगदीच मूलभूत असं सत्य . की ज्यात कोणताही माणूस प्राणी पक्षी झाडे वेली फुलं, ग्रह तारे सूर्यमाला आणि त्याही पलीकडे एक अनंत अशी पोकळी.. एका निसर्गाच्या वर्तुळाप्रमाणे येणार आणि जाणार. अनादी अनंत कोटी वर्षे हेच चालू आहे आणि त्या सत्याचा आवाका देखील मोठा आहे म्हणजे व्याप्ती ..म्हणजे अगदी खगोलशास्त्रामध्ये देखील.. लांब लांब दिसणारे लुकलुकणारे तारे (का ग्रह?) हे देखील असंख्य खळबळजनक  घडामोडींमधून जात असतात आणि एकटेच असतात. ते 'जिवंत असणाऱ्यांमध्ये' नसतील देखील पण तेही एकटेच लुकलुकत असतात. कधी कोणी दुसऱ्याचा प्रकाश घेतो कधी स्वतःचाच. पण ह्या सगळ्याच्या पाळामुळाशी गेलो तर हे खरेच आहे की आपण एकटे असतो.

कठीण आहे मानायला, झेपायला, पण तेवढेच कटू सत्य देखील. मग हा एकाकीपणा नक्की काय असतो? त्यात दुःख असतं का? तर हो. आपल्याला त्या वेळी तरी वाटतं कि आपण एकटे पडलोय आपल्या साथीला कोणी नाही...आपल्याला समजून घेणारं असं मैतर कोणी नाही .. वगैरे वगैरे असंख्य विचार दाटून येतात मनात आणि त्त्यांना दुजोरा द्यायला ही एक भावना एखाद्या लाटेसारखी बेभान येते.. एकाकीपणा ..

ह्याच लाटेला एक आल्हाददायक आणि आश्वासक ओहोटी आणणारा, दुसरा विचार किंवा भावना म्हणजे स्वमग्न असण्याची. ज्यात मग आपल्याबरोबर आपले आप्तेष्ट असतीलही. नसतीलही. त्यातही आपण एकटे असू शकतो पण तेंव्हा ही भावना खूप सुखकारक असते. एकाकीपणासारखी दुःखी नसते. आपण आपल्यात रमलेलो असतो. स्वमग्न असणं ..म्हणजे खुद में मुशगूल रेहेना..

पण एकाकीपणा आणि स्वमग्न असणं ह्यातली सीमारेषा फार धूसर आहे असे ही माझ्या लक्षात आले. आपण आव आणू शकतो की स्वमग्न आहोत आपण स्वतःमध्ये आनंदी आहोत, बेहोष आहोत..स्वतःमध्ये सामावलेले आहोत..पण तो कदाचित आतून एकाकीपणा असेल, स्वतःला मान्य न करणारा ?

खरं सांगायचं तर एकाकीपणा हा मान्यताप्राप्त नाहीच आहे. म्हणजे त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाहीये :) म्हणूनच तर कोणीही बिचकेल .. ऐकून. किंवा बरेच से जणं स्वतःच मान्य करत नसल्यामुळे इतर कोणाचा एकाकीपणा  ही मान्यच करू शकत नाहीत.. माझ्यातली सकारात्मक मी नेहेमीच सांगते मला, की हे तात्पुरतं आहे.  एकाकीपणाची लाट येते, तशीच मनाला भरून येण्याची लाट देखील येते च की..

असे हृदयस्पर्शी  क्षण ही येत असतात. आपल्या माणसांबरोबर सहज पणे भेटताना, कोणताही मुखवटा न घालून.. भरती च तर येत असते.. स्वानंदाची ओहोटी ही काही वाईट नसते..जरी वरकरणी स्वानंदी माणूस disinterested वाटला दिसला तरी तो स्वमग्न अस
तो .. तीरावरच्या सुख दुःखांची तमा त्याला नसते .. एखादा फकीर असतो ना तसं . किंवा संत कबीरांचे दोहे असतात तसं .. तो गाणं म्हणत असतो.. ऐकणाऱ्यांना आवडो नआवडो.. like करो वा न करो :)

तर हे सगळे भावनांचे खेळ ..म्हणूनच तर ह्यातल्या सीमारेषा धूसर आहेत. मी स्वमग्न आहे
वेगळं आणि मला कधी तरी एकाकी वाटतं हे वेगळं . तेही खरं हेही खरं . त्या येणाऱ्या लाटा ही खऱ्या आणि जाणाऱ्या ही खऱ्या.. किनाऱ्यावर आदळणार्या देखील खऱ्या आणि निर्मनुष्य आणि गहिऱ्या अशा खोल महासागरात अस्पष्ट दिसणाऱ्या लाटा ही खऱ्याच.  सगळे लाटांचे आणि भावनांचे मायाजाल..

हे सगळं लिहिता लिहिता मला आता एकदम लक्षात आलं की मला समुद्र, लाटा का आवडतात..:)  कारण आपलं मन म्हणजे एखाद्या अनंत पसरलेल्या समुद्रासारखंच असतं..लाटा वेचायला गेलो तर हातात काहीच लागणार नाही. एकाकी काय, स्वानंद काय, प्रेम काय जिव्हाळा काय, राग काय लोभ काय.. कित्येकदा आपण ह्या सगळ्यांना शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयन्त करत असतो. कवी, कलाकार तर अजूनच जास्त .. पण बऱ्याचदा हे भाव फुलपाखरासारखे बघता बघता हवेत उडून जातात किंवा एखाद्या माशासाखी डुबकी मारून नाहीसे होतात.

तसे म्हंटलं तर प्रत्येकाला च साथ हवी असते ..समांतर विचार करणारी माणसं हवी असतात. समांतर ? समान नाही. कारण कोणीच एकसमान नसतं .. प्रत्येकालाच आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. प्रेम द्यायला व्यक्ती हवी असते. मग त्यात सगळ्या range मधले प्रेम हवं असतं, प्रेम द्यायचं ही असतं  .. मग मैत्री असो प्रियकार प्रेयसी असो, नाती  असोत, आपल्याबरोबर काम करणारी माणसं असोत , समाजाचा घटक म्हणून बरोबरची माणसं असोत, ओळखीची असोत किंवा अनोळखी असोत. माणूस तसा समूह्प्रीय प्राणी आहे आणि म्हणूनच त्याला एकटेपणा देखील आहे :) पु ल म्हणतात तसं ..एक शून्य मी पुस्तक मध्ये . कधीतरी माणसात असूनही किंवा नसूनही एकाकी पणा  जाणवू शकतो किंवा जाणवतोच.. आपण जबरदस्तीने त्या भावनेला पुरून टाकून म्हणतो किंवा म्हणायचं प्रयत्न करतो की आपण स्वमग्न आहोत.. solitude मध्ये आहोत... पण अगदी खरं म्हणजे ते वरकरणी असतं.  त्यावेळी तरी.

ह्या ही भावना खऱ्या आहेत त्याही खऱ्या.. आणि मग आपण हे ज्या क्षणी मान्य केलं, accept केलं, त्याच क्षणी आपण स्वतंत्र होतो. कोणापासून? स्वतःपासून..A true lib moment. सगळेच भाव मान्य करत जगणं .. मग तो एकाकी पणा ही का असेना? ..

ते भाव प्रामाणिक पणे आधी स्वतःशी मान्य करणं आणि मग जमल्यास आपल्या  व्यक्तींपर्यंत पोचवणं ..

 म्हणजेच जगणं ..काटा रुते कुणाला.. मज फूल ही रुतावे ..
 


Sunday, March 23, 2025

माझे बॅगी जीवन

जरुरत है जरुरत है... सख्त जरुरत है ..:) हे हिंदीत गाणे आठवत असेल तुम्हाला? त्यात त्या हिरो ला एका शिरीमती ची , कलावती ची गरज असते. आणि हो, 'सेवा करे जो पती की'ची  ची पण. :) असते आपली आपली गरज एकेकाची. तुम्ही म्हणाल आता ह्याचा बॅगेशी काय संबंध? सरळ  विषयावर का येत नाहीये ही? तर नाही मला आवडत सरळ विषयावर यायला कधी कधी. माझी मर्जी? :) असो, विनोदाला बाजूला राहूंदेत, ऊर्फ,  jokes apart !

मी एका सुंदरशा बॅगेच्या शोधात होते. ती अशी असेल, ती  तशी असेल, ती कशी असेल ? देखणी असेल का? कलावती असेल का ? सर्वगुणसंपन्न असेल का? उपयुक्त असेल का? टिकाऊ असेल का? हलकी फुलकी असेल का? हवेशीर असेल का? वगैरे कित्येक प्रश्न. माझी एकंदरीत प्रवासाची आवड, केलेले असंख्य प्रवास तेही वेगवेगळ्या माध्यमातून, कधी आवडीने कधी सवडीने, कधी घाईने तर कधी गर्दीने. कधी स्वदेशात तर कधी परदेशात आपले मानून राहताना ..केलेला प्रवास आणि त्यातल्या बॅगा .. आणि कधी नाईलाजाने करायला लागलेला प्रवास..  

कित्येक वेळा परदेशात राहत असताना, जास्त करून US मध्ये, असंख्य बॅग वाहतुकीतून झालेली कधी कधी ची माझी बिकट अवस्था .. वीस वीस किलोच्या दोन मोठ्या मोठ्या बॅगा नेताना . त्यांच्याकडे हताश होऊन बघताना की आपल्याला हे सगळे वजन पेलवणार आहे का? कधी मोठे धिप्पाड पोर्टर्स, माझ्याकडे काम मागत असूनही त्यांच्याशी काय बोलायचे काम कसे सांगायचे माहित नसल्यामुळे झालेली अडचण. स्वतःच स्वतःच्या बॅगा वाहण्याचा केलेला अट्टाहास आणि त्या बॅगांमधून मांडलेला, नेलेला आणलेला संसार..म्हणजे अगदी शब्दशः नाही तर संसार म्हणजे सगळंच, त्याबरोबर निर्माण केलेला यत्र तत्र चा फाफट पसारा देखील..     

ह्या सगळ्यातून मी खूप काही शिकले. एक महत्वाचे ते म्हणजे आपल्याकडे काहीही असो नसो, एक छान बॅग मात्र पाहिजे. :) आपले पुलं म्हणायचे 'माझे पौष्टिक जीवन', तर मला म्हणायचे आहे 'माझे बॅगी जीवन' आणि त्या भिंगातून आता बघत असताना मला दिसलेली, दिसत असलेली एक  वेगळीच दुनिया.

तर नुकतीच मला माझी कलावती सापडली. :) जिच्या मी शोधात होते. जिसे ढुंढती  हूँ  मैं हर कही..करत करत..एक सुंदर ओशन ब्लू कलर. हलकी फुलकी. खूप कप्पे. व्हील्स मस्त. केबिन बॅग. expandable. म्हणजेच वाढीव जागा असेलेली.  मी खूप खूष झाले. वाटलं हीच ती बॅग. हसीं हजारो भी हो खड़े मगर उसी पर नजर पड़े, तशीच. आणि एकदम झरझर  करत वर्षामागून वर्षे गेली..

अनेक आठवणी बॅगांमध्ये दडलेल्या आठवल्या.  कधी मी स्वतः भरलेल्या तर कधी माझ्या बरोबरच्या आप्तस्वकीयांनी, सहप्रवाशांनी भरलेल्या..असंख्य विमानाच्या बॅगेच्या पट्ट्या आठवल्या आणि त्यावरून सरकत सरकत जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवाशांच्या वेगवेगळ्या आकाराच्या, आणि रंगांच्या बॅगा आठवल्या.. त्यांची आतुरतेने वाट बघणारी माणसे आठवली. माणसे, जी कुठेतरी जाणारी कुठेतरी येणारी.  कधी बॅग आली नाही विमानाच्या पट्ट्यावरून तर आपल्या जिवाभावाच्या माणसांएवढीच जवळीक साधणारी ही त्यांची बॅग.. आलीच नाही तर? कुठे गेली असेल? कशी असेल? कहां है तू? कैसी है तू? म्हणत म्हणत जीवाचे रान करणारी माणसं ही बघितली आहेत मी..  

कधी घर गाठू बघणाऱ्या कदाचित प्रवाश्यांसारख्याच बॅगा ही असतील? दमलेल्या, भागलेल्या , आतुरलेल्या..  त्यांनाही त्यांची मनोगते असतील का? कधी शाळेत मनोगते लिहायला यायची. त्यात बॅग मात्र कधी नव्हती.  असे मनोगत लिहायला आले असते तरी देखील जे अनुभवातून लिहिले जाते तेच खरे मनोगत नाही का? कदाचित हे विधान पूर्ण खरे नसेल ही. कधी काल्पनिक गोष्टीही खऱ्याच असतात. पण काहीही असो, आता माझ्या ह्या बॅग 'rewinding' मध्ये मला असंख्य गमती जमती, सुखे आणि दुःखे , हसू आणि आसू दिसायला लागली..

गम्मत म्हणजे बॅगा सुद्धा इतक्या विविध आकार आणि ऊकारांमध्ये येतात की बस्स. छोटी मोठी,  केबिन चेक इन ह्याव आणि त्य्याव. काही रग्गेड काही नाजूक. काही लॅपटॉप साठीच्या तर काही अजून काही. काही corporate तर काही casual. काही भरमसाठ वस्तू राहतील अशा काही आटोपशीर. काही ना असे लॉक तर काहींना तसे लॉक. आजकाल अजून एक बॅग समूह निर्माण झाला आहे तो म्हणजे ट्रॅव्हल कंपनी केसरी वीणा SOTC इत्यादींच्या ब्रँड वाल्या बॅगा. म्हणजे कोणी वाटसरू चुकले माकले तर त्यांचा तपास करायला बरे. मग एकदा ती ट्रिप संपली तरी मग त्याच बॅगा  इतस्ततः  प्रवास करताना दिसतात त्याच आधीच्या तिकिटावर.. :) कित्येक वेळा तर अशा सारख्या सारख्या वाटणाऱ्या बॅगा बघून वाटायला लागतं की हे सगळे बॅगांचे देखील विश्वरूपदर्शन आहे की काय? सगळे सेम, तुम्ही आम्ही सगळेच. अहं ब्रम्हास्मि :) आणि मला ह्या सगळ्या अहं ब्रह्मास्मि तूनच बाहेर पडायचे होते. :) कृष्ण अर्जुनाला काय म्हणाला? तर तू तुझ्यासारखा वाग. स्वधर्म पाळ. तेंव्हाच तुला ह्या सगळ्या बॅगवतींमधून स्वतःची बॅग ओळखण्याचे सामर्थ्य मिळेल.

तर coming back to the airport. जरुरत है गाण्यामध्ये हिरो पुढचं म्हणतो, "तो साथ में आस्मा चले".. विमानतळ ही अशी जागा आहे तिथे बॅग ह्या entity ला अनन्यसाधारण महत्व आहे. तिथे बॅगेलाही  लागते जर एक्सट्रा वजन भरलं तर. सगळं गणित विमानाच्या thermodynamics वरती अवलंबून असतं. त्यात भावनांच्या भरात वाहवून नेण्यासारखं ही नसतं काही आणि तसं केलं तरी त्याला एक विशीष्ट किंमत मोजावी लागते. सिडनी विमानतळावर एका आजी आजोबांना अडवल्याचं ऐकलं होता सामान जास्त झा
लं म्हणून; तर त्यांनी तिथे विमानतळावर बसूनच बॅगेतले सगळे रवा बेसन लाडू संपवले म्हणे लाडूंना न्याय द्यायला.  आपली मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्याच्याशी निगडित 'Law of Conservation of Energy'  :) त्यांनी किती लाडू खाल्ले आणि त्यांच्या तब्येतीचे पुढे काय झाले ते कोणालाच पुढे कळले नाही. बॅग हलकी झाली एवढे मात्र निश्चित. 
 
तर अशा संख्या बॅगा अडी अडचणीतून मार्ग काढत, कधी बेदरकारपणे भिरकावून दिल्या जात असतील, कधी काळजीपूर्वक हाताळल्या जात असतील, सगळे करत करत शेवटी दाटीवाटीने विमानाच्या सामानाच्या अवाढव्य कप्प्यात बसत असतील? कधी धास्तावून तर कधी निडरपणे?


ह्या सर्व rewinding मध्ये सगळ्यात धमाल प्रश्न म्हणजे खरोखरच प्रवासात  सामान किती ठेवावे? माझा एक अमेरिकन colleague मला म्हणाला होता की 'there is nothing as beautiful as a little child packing a bag for a trip'. मलाही गम्मत वाटली एकदम. का असेल ? एक म्हणजे लहान मुलांना बॅग भरायला सांगितली की त्यांना वाटतं अक्खा आणि हवं  ते सगळंच नेता येईल. मग ते ज्या पद्धतीने हव्या त्या वस्तू घेतील त्यात कदाचित आपलयाला म्हणजे मोठ्यांना महत्वाचं वाटेल च  असे ही नाही पण ते जे काही घेतील ते फार निरागस असेल. मी स्वप्नामधून बाहेर आले.

माझी एक मैत्रीण वारी ला जायला म्हणून आली होती माझ्याकडे. आम्ही दोघी मग गेलो होतो. तिने माझ्याकडे येताना एका दिवसासाठी च पण एक खूप जड आणि मोठी भरलेली अशी बॅग आली होती.. मी आणि ती  बोललो देखील ह्याबद्दल..हळूहळू बोलताना लक्षात आलं कि खरंच तिने आणलेलं सगळंच सामान तिला लागणारं होतं..आम्हाला कळत होतं आम्ही ज्ञानेश्वर तुकारामाच्या वारी ला जातोय तिथे जाताना रितं होऊन जायचंय किंवा रितं व्हायला जायचंय पण तरीही त्या आधी मात्र आम्हाला काही ना काही हवं होतं ... 

ह्या सगळ्यात एक मात्र लक्षात आले बॅग म्हणजे एक 'limited space'. एवढेच नेऊ शकतो आपण. काहीतरी सोडून द्यावे लागते. काहीतरी 'drop' करावे लागते. काही तरी जड कमी करावे लागते. कारण ते पुढे जाऊन आपल्याला पेलवणार नसते. काहीतरी ठरवावे लागते. अनावश्यक काय आणि आवश्यक काय. काहीतरी  तारतम्य बाळगावे लागते.. तरच आपण खरे प्रवासी होऊ शकतो.. light weight travelers..

वस्तूंच्या पलीकडे जाऊन कदाचित मला दवबिंदू pack करायला आवडतील. कदाचित गवताची थोडी पावसाने भिजलेली पाती देखील ठेवायला आवडतील. काही रानफुले कदाचित? कदाचित एखाद्या जाताना लागलेल्या देवळातले तीर्थ? भरधाव वेगाने जाणारा वारा? थोडा समुद्र ? थोडी त्याला कुठून कुठून काय काय करत येऊन मिळालेली नदी? थोडंसं चिमण्या पाखरांनी काड्या मुड्या जमवत जमवत बांधलेलं घरटं? थोडीशी वाळू? थोडेसे निसर्ग परतीच्या काहीही अपेक्षा न करता,
पल्याला जे काही अचाट अनुभवायला देतो, ते सगळे, त्यातले अनेकविध चमत्कार?  

विचार करा तुम्हाला प्रवासाला निघायचे आहे, घरातले किंवा तिथे असाल तिथले सगळे सामान हवे आहे, सगळ्या खोल्यांमध्ये जड अवजड , बरेच काही .. तुम्हाला ५ मिनटं दिल्येत. काय काय पॅक कराल ह्या तुमच्या बॅगे मध्ये? जागा सीमित आहे. खरं तर वेळ ही सीमित आहे..
  

Saturday, March 15, 2025

अश्रूंची झाली फुले

 काहीतरी कशातरी नव्याने परिवर्तित होणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. मला ह्या अशा वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मशन्स बद्दल फार आतमीयता आणि कुतूहल वाटत आले आहे. एखादी गोष्ट आधी वेगळ्या फॉर्म मध्ये असते मग नंतर ती आपोआप कालावकाश फॉर्म बदलते. अशा सगळ्या गोष्टींमध्ये एक अतिशय सुंदर आणि भावणारी गोष्ट म्हणजे अश्रूंची फुले होणे. खरे तर दोघांचा काही डायरेक्ट संबंध नाही. पण खूपश्या कविता आणि गोष्टींमध्ये अश्रूंची फुले होणे हे वाचनात येत गेले आहे. मग म्हणजे होते काय? 

अश्रू खरं तर जास्त करून दुःख व्यक्त करतात... काहीतरी साचलेले असते मनात हे अश्रूंच्या माध्यमातून बाहेर येते.. ते एक कारण बनते निमित्त मात्र. साचलेले काहीतरी वेगळेच असू शकते पण त्याच वेळी ते व्यक्त होणे देखील महत्वाचे असते. अश्रूंना जर धरण घालून खूप जास्त किंवा कृत्रिमरीत्या रोखून धरले तर तेही मनासाठी चांगले नसते. वाटले, रडले व्यक्त झाले पुढे गेलो इतक्या सहजतेने रडणे झाले तर तसेच हसणे ही होऊ शकते असे मला वाटते. मी असे कित्येकदा बघते की जे खूप प्रयत्नपूर्वक अश्रू बंदिस्त करून ठेवतात त्यांना नंतर नंतर अथवा हळूहळू हसणेही कठीण जायला लागते.. 

म्हणजेच भावनांना अध्याहृत धरू नये.. हसू आणि आसू कदाचित शेजारी शेजारीच राहात असतील? आणि अश्रू देखील कधी दुःखाचे कधी आनंदचे देखील असतातच की? ह्या सगळ्यात अश्रूंची झाले फुले हा एक मेटॅमॉर्फोसिस आहे. म्हणजेच ते सुरवंट जसे खूप स्टेप्स मधून मोठे होत अचानक एके दिवशी सुंदरसे फुलपाखरू बनून उडून जाते तसेच अश्रू देखील कधीतरी रडत रडत अचानक एके दिवस सुंदर से हास्य बनतात तर कधी एक सुंदर शी अभिव्यक्ती बनतात तर कधी एखादे सुंदर से गाणे बनतात तर अशी कोणतीही कलाकृती बनतात...आणि दरवेळीच कलाकृती कशाला हवी? कदाचित एखादी छोटीशी मोकळे पण दिलेली दाद बनतात.. ज्या ज्या गोष्टींमध्ये मोकळे पणा आहे, सौंदर्य आहे ते बनतात आणि त्यांनाच कदाचित फुले म्हणत असतील?? 

Wednesday, March 12, 2025

काटकसर हवीच पण कंजूषपणा नको

माझ्या शाळेत आल्याआल्या विंग मध्ये खूप छान छान सुविचार लिहिलेले असत. अगदी शाळेतल्या वर्गात सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला रोज एक नवीन छान विचार उर्फ सुविचार लिहायला सांगितला जात असे. तेंव्हापासूनच हा रोज एक सुविचार मनावर लिहिला जात असे, खडूने. हे सगळे इतके ऑरगॅनिक होते, की अजूनही मी quotes च्या शोधात असते.. 

"काटकसर हवीच पण कंजूषपणा नको". हा एक त्यातलाच एक कोट.  घरीही ह्या कोट ला साजेसेच वातावरण होते. म्हणजे अगदी त्यातल्या त्यात काटकसरीकडे झुकणारे जास्तच. काटकसर होतीच, पैसे ही फारसे नव्हते, होते ते व्यवस्थित खर्च व्हायचे, वाचवत वाचवत, सगळेच जुळून यायचे. त्यात आम्ही ही आहे त्यात खुश होतो. साधी राहाणी हे मूळ तत्व उर्फ value foundation होते. मग काटकसरीची सुरवातच भाजी बाजारापासून व्हायची. आई किंवा बाबा भाजी माफक दरात मिळेल तिथून आणायचे मग त्या साठी थोडे जास्तीचे कष्ट घेतले तरी चालतील. किंवा खरं तर कष्ट हाच धर्म होता. तो आम्ही बघितला अनुभवला आणि कधी question करावासा वाटला नाही. शाळेतली, मित्र मैत्रिणींची, नातेवाइकांबरोबरची  सेलेब्रेशन्स देखील तशी साधीच असायची हो त्यातही काटकसर ला मूलभूत घटक किंवा अगदी आयुष्याचा 'महत्तम सामायिक घटक' उर्फ मसावि होता म्हंटलं तरी हरकत नाही. 

उन्हाळा  सुरु झाला कि शाळेत अगदी ह्या quote ला साजेसे सेलेब्रेशन व्हायचे. कैरीची डाळ, पन्हे आणि कलिंगड  'क प क' सेलेब्रेशन म्हंटले तरी चालेल. अगदी आजच्या काळातल्या A B C  ज्यूस सारखे. :)

मग पुन्हा एकदा त्या काळात डुबकी मारून हे बघावे म्हंटले तर वाटते की फक्त काटकसर च होती का? का कंजूषपणा देखील होता? तर नाही. घरी सगळे गोड  धोड पदार्थ बनायचे, विकत आणायचो.  कपड्यांची थोडी फार चैन होती,  प्रवासाची आवड असल्याने रिकरिंग अकाउंट चालू करून आई बाबा पैसे वाचवायचे आणि आम्ही जमेल तसे फिरतही असू . इन फॅक्ट मला प्रवासवर्णन लिहायची किंवा काहीतरी लिहायची आवड ह्या च काळात निर्माण झाली. म्हणलं तर सुट्टीत पिक्चर बघणे, नाटक बघणे गाण्याचे प्रोग्रॅम्स बघणे जास्त करून मूड्स ऑफ रफी हा, किंवा अगदी मराठीतला गीत रामायण देखील. कधी पुढचा रो कधी थोडा मागचा किती खर्च करायचा त्यावरून विचार केला जात ही असेल. पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वानंद शोधायला स्वातंत्य्र देखील मिळत असे. :) 

कधी वाटतं स्वानंदाची काही किंमत असते का? फार नसेल किंवा बिलियन डॉलर च्या ही पलीकडे असेल? एखादा फकीर आनंदी असतो तशी?  तर काहीही असो , आपण तो आपण मिळवला पाहिजे, आपल्या जवळच्यांना वाटला ही पाहिजे..खर तर..तेच होत ही असे! आनंद द्विगुणित किंवा त्रिगुणित होणे हे सगळे ह्यातून विनासायास घडत असे. 

आनंदाचा भागाकार होण्याची करणे देखील फारशी नव्हती. सो निखळ आनंद जास्त वाटत असे आणि तो पैशाने विकत घेता येत ही नसे :) 

म्हणजे पैसे महत्वाचे नाहीत का? होते तर. पण आहे ते थोडे फार  काटकसरीने राहून, पण कंजूषपणे न राहता जमून जात असे. 

ह्या सगळ्या ला आता अनेक पर्व  उलटली. अजूनही काही गोष्टी मूल्ये तशीच आहेत. बघितलं  तर आता काळाच्या ओघात पैसे ही आले, राहणीमान आले, luxuries आल्या. गाड्या आल्या , घोडे आले (ते नाही आले पण आपला असच लिहिला :)). गॅजेट्स आली. प्रवास आले. अजूनही चालू. सगळं सगळं च quantitatively वाढत गेलं , सुधारलं. काटकसर कमी झाली. कंजूषपणा नव्हताच पण कुठेतरी सगळ्या  मुल्यांचा मेळ जमेनासा झाला . म्हणजे वास्तविक पाहता मूल्ये तीच राहिल्येत. पण त्यांची आजच्या काळातली आकडेमोड थोडी गडबडली. आज खूप जणांकडे लॅव्हिश घरे आहेत, बऱ्याचशा मटेरिअलिस्टिक गोष्टी ही आहेत. काटकसर नावाचे ते नाटकातले पात्र कुठेतरी माळ्यावर निघून गेल्यासारखे वाटते. वारेमाप पैसे मोजले जातात एखाद्या इन्स्टंट आनंदा साठी, एखाद्या मोठ्या इव्हेंट साठी, किंवा असेच काहीतरी. हे सगळे आजूबाजूला चाललेले दिसते .. पण मला वाटतं हे सगळे transformation किंवा परिवर्तन आपण रोखू शकत नाही आणि रोखू ही नये. पण त्यावर घोड्यावर आरूढ होतो तसे आरूढ व्हावे. 

म्हणजे काय,..? तर कदाचित त्याच values आहेत..  एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीतील खर्चाचा आवाका बघावा देखील पण बिनधास्त मग खर्च ही करावा. वस्तू मधून आनंद मिळत नसला तरी हेही अर्धसत्य आहे. आजच्या काळात लागणाऱ्या काही गोष्टींवर काळाची गरज म्हणून नक्कीच खर्च केला पाहिजे.  वोह जिंदगी ही क्या जिस में हम पैसे सिर्फ एक बक्से में राखे? या दिल कि सुनो दुनियावलो? दिल की आवाज भी सुन? .. काटकसर हवीच पण इतकीही नको की आपण पैसे असूनही ते खर्च कसे कशावर करावेत हेही विसरून जाऊ. म्हणतात ना penny wise pound foolish बानू.  किंवा पैसे असूनही अकबर  बादशाह सारखे वागूनही काय मजा त्यात? बूंद से गइ वोह फीर हौद से नही आती ? 

सगळ्यांनाच अकबरासारखा बिरबल भेटत नाही.. आपल्यालाच आपलेच बिरबल व्हावे लागेल. एक बिनधास्त दिलदार आयुष्य जगायला .. आणि तेही अगदी 'बुंदे' वालं नाही.. 'हौद' वालं ही नाही.. कुठेतरी त्यांच्या सीमा रेषेवर? व्हॉट से ?

Thursday, November 14, 2024

जीन्स चे वजन

असा कधी भन्नाट विचार तुमच्या मनात आला आहे का? कि जीन्स चे वजन करून बघू? किंवा गूगल सर्च करून बघू की, आपल्या (आपापल्या) जीन्स चे सरासरी वजन किती असते? खरं तर असले वेडे प्रकार कशाला? :)


डाएट व्यायाम आणि नुट्रीशन हे माझे आवडते टॉपिकस असले, आणि मी जरी ऋजुता दिवेकर चे व्हिडिओस आणि तिचे करीना कपूर बरोबरच्या मुलाखती बघितल्या असतील तरी देखील स्वतःचे च वजन करतो ना आपण? जीन्स चे वजन? 


तर असे आहे की नुकतेच मला दोन एक महिन्यानंतर वजन करण्याचा चान्स मिळाला. :) मी खुश झाले. डॉक्टर कडे गेले होते रेगुलर अल्ट्रासाऊंड टेस्ट्स साठी, म्हंटलं विचारुयात, वजन काटा आहे का. तर चक्क होता. :) दोन महिने गेले होते मध्ये म्हणूनच एक प्रकारची धडधड, किती असेल वजन? :) ह्याला म्हणतात speculation :) मधल्या कालावधीत दिवाळी येऊन गेली होती, माझा वाढदिवस मग वेगवेगळे गोड  पदार्थ खाणे आणि माझ्या रेफेरिंग डॉक्टर चा सल्ला न मानणे  वगैरे वगैरे. तरीही एक मन सांगत होतं की वजन तेवढेच असेल जेवढे लास्ट टाइम दोन महिन्यांपूर्वी केले. आणि हो मी थोडीच दर दिवशी वजन करते? तशी मी  एकदम नॉर्मल आहे. अधून मधून जाता येता वजन करावे, सारखे सारखे गरज नाही. असे माझे मत आहे. 


पण तरीही मी मनोमन घाबरले होते. आणि व्हायचे तेच झाले, वजन जास्त आले माझ्या अपेक्षेपेक्षा. एवढे रोज दोन दोन तास चालून देखील? एक मन डाफरलं माझ्यावर. दुसरं मन म्हणालं  की हे शक्यच नाहीये. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या दुःखांचं  खरं  मूळ असतं  ते म्हणजे non-acceptance. मग आपण करणे शोधायला लागतो. आणि मग मला थोडा फार प्रश्नाच्या मुळापर्यंत गेल्यानंतर लक्षात हुशारीने लगेच लक्षात आला ते म्हणजे जीन्स चे वजन. :)


गूगल सर्च. प्रॉम्प्ट इंजिनीरिंग. लगेच मी मला हवी ती query बनवली. :) मला हवं  ते उत्तर मिळालं . की एका एव्हरेज जीन्स चे वजन सरासरी २ ते ३ किलो असतं. हलक्या म्हणजे चांगल्या  प्रतीची जीन्स असेल तर १ ते २ किलो. :) मग मी उत्तरांचा अवरेज काढला. २ किलो. माझ्या वजनातील त्रुटी मला लगेच कळली. :) 


मग मी खुश होऊन रेफेरिंग  डॉक्टर कडे गेले रिपोर्ट दाखवायला. तिचायकडे लागोपाठ करावं लागलं तरी वजन करणे सेरेमोनी होतोच तिथे. हे  मी विसरलेच  होते कि एका दिवसात एक दोन तासातच दोन ठिकाणी वजने होतील. मग मला वाटलं गुरुत्वाकर्षण. तिकडचे गुरुत्वाकर्षण आणि इकडचे ह्यात काही फरक असेल का? आणि हो मुंबई आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणचे गुरुत्वाकर्षण देखील वेगळे असू शकते. विज्ञान शिकल्याचे दुष्परिणाम. :) तर खैर, ही डॉक्टर तर माझी एकदम आवडती आहे. तिच्याकडे तर गेल्या ८ वर्षांचा माझा वजनाचा रेकॉर्ड ही असतो, ऋजुता दिवेकर कडे करीनाचा असेल तसा. नाही मला कोणत्याखी प्रकारे झीरो फिगर मेन्टेन करण्यात इंटरेस्ट नाहीये, ऑफ कोर्से. हम सिर्फ इतना चाहते हैं  के हम अपनी  मेंटल फिसिकल हेलथ का ठीक से खयाल रखे. 


तर मला ह्या माझ्या आवडत्या डॉक्टर ने डायरेक्ट तिचा ८ वर्षांचा डेटा ऍनालीटीकस दाखवल्यावर मी मान्य केलं  स्वतःशी. Acceptance ! जीन्स चे वजन इस नॉट द कलप्रिट. आय एम रिस्पॉन्सिबल :)


ह्यापुढे ही असे आणि असंख्य वेडे विचार मनात येतील, पण माझा एकच सल्ला असेल (विचारला नाही तरी), जीन्स चे वजन करायला जाऊ नका. GPT वापरायचाच असेल तर जास्त सत्कारणी लागेल अशा ठिकाणी वापरा :)

Tuesday, November 12, 2024

एक बार वक्त से लम्हा गिरा कही

काही गाणी आपल्या रोमारोमात किती भिनलेली असतातत ना? तसेच हे गुलझार चे 'आनेवाले पल जानेवाला है'. मूवी तर धमाल च होती -गोल माल. खरोखरच गोल माल आणि खूप सारे गोंधळ त्यातून निर्माण झालेले नाट्य त्यात अमोल पालेकर चा डबल रोल. तरीही मुव्ही कदाचित मी परत परत बघणार नाही, हे गाणे मात्र परत परत ऐकेन त्यातल्या अर्थावर विचार करेन, आणि तसेच जगायचं देखील कदाचित प्रयत्न ही करेन. 

त्यातलीच एक लाईन. एक बार वक्त से लम्हा गिरा कही... वहा दास्तान मिली .. ह्यातले अतिशय सुंदर मर्म म्हणजे, वक्त आणि लम्हा ह्यातला मेळ. वक्त म्हणजे अनादी अनंत असा 'मैं  समय हुन'. महाभारतातला धीरगंभीर आवाज.. सिरीयल सुरूच ह्या वाक्याने व्हायची. म्हणजेच मॅथेमॅटिकस च्या भाषेत इंफायनाईट टाइमलाईन. जिला सुरवात नाही जिला शेवट नाही. नाव आहे चाललेली काल ही अन आज ही.. 

हा सगळं वक्त चा स्पॅन ..त्यातनं एक लम्हा म्हणजे नक्की काय ? तर एक छोटासा बिंदू.. तोच लमहा जेंव्हा टाइमलाईन पासून निखळून पडतो.. तेंव्हा मागे वळून माघितलं त्या जागी काय मिळतं? तर लम्हा काही नही. तिकडे फक्त एक दास्तां उर्फ कहानी, एक वर्णन मिळतं ..एक स्टोरी मिळते.. आपल्याला हवी  तशी बनवलेली. पण ती तो मोमेन्ट म्हणून कधीच परत येत नाही. चांगला असो वा  वाईट वा त्यातला मधलाच काहीतरी. neutral. 

पण मग सगळं खेळ हा 'पल दो पल' का आहे .. आनेवाला पल..भी.. जानेवाला है.. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो ...पल ये जो जानेवाला है.. तेही गुलझार म्हणतोय की हो साके तो..पण का आग्रह धरत नाहीये? कारण अट्टाहास केला तरी तो लम्हा अजून निसटून जाऊ शकतो.. दास्तां बनत बनत..

मग त्या एका छोट्याशा इवल्याशा क्षणांमध्ये आपण आपल्याला झोकून देऊ शकतो का? हो सके तो? 

Monday, November 11, 2024

माझी बर्ट्रांड रसेल म्युसेली

हे काय? बर्ट्रांड रसेल म्युसेली ? बर्ट्रांड रसेल हा तर ब्रिटिश फिलॉसॉफर होऊन गेला ना ? मग त्याचा म्युसेली शी काय संबंध? संबंध असा की बर्षर आणि बर्ट्रांड ह्यांच्या उच्चरातले साम्य. खरं तर ह्या रेसिपी चे नाव आहे बर्षर म्युसेली! माझी अतिशय आवडती ब्रेकफास्ट डिश. पहिल्यांदा मी आणि माझा नवरा आम्ही  ऑस्ट्रेलिया त असताना खाल्ली. मस्त बनवली होती त्या होमस्टे च्या ओनर ने. त्यानंतर असेच कित्येक वर्ष कुठे काही ट्रॅव्हल असेल तर ही डिश मी आवर्जून घेत असे हॉटेल मधल्या ब्रेकफास्ट मध्ये. म्हणजे अगदी उडी मारून घेत असेल असं म्हंटलं तरी चालेल. 

माझे खाद्यपदार्थांमधले रिव्हर्स इंजिनीरिंग तेंव्हा एवढे जागरूक नव्हते. म्हणजे मी फार विचार करत नसे, खायला मिळालं आहे ना, त्याची कृतज्ञता व्यक्त करून मी खात असे. म्हणजे बेताने च हं, हावरटासारखे नाही, पण मन लावून वगैरे. 

कमिंग बॅक तो म्युसेली, एकतर नावच एवढे कठीण आहे उच्चारायला. त्यात बर्षर म्युसेली. आपली मराठी नावे बघा, उपमा, पोहे. छोटे छोटे साधे शब्द. हे बर्ट्रांड रसेल सारख्या तज्ज्ञ लोकांमुळे किंवा बर्षर म्युसेली सारखी कठीण कठीण नावे ठेवणाऱ्या अज्ञात माणसांमुळे सोप्या गोष्टी कठीण होतात. नाही का?

पण मी ठरवलं बर्षर म्युसेली बनवायचीच, जेंव्हा माझ्या नुकत्याच केलेल्या बोर्निओ ट्रिप मध्ये मला खूप ठिकाणी ही डिश खायला मिळाली. एक नवीन मत्रीण झाली ट्रिप मध्ये, ती  म्हणाली मी ही रोज करते. मी भितीयुक्त आदराने तिच्याकडे बघितले. ती म्हणाली ही 'नॉन-कूकिंग' रेसिपी आहे. मला अजूनच गोंधळायला झाले. म्हंटलं सांग पुढे. व्हर्जिन अँपल ज्युस घायचा, रोल्ड ओट्स घ्यायचे मग ते रात्री १० तास अँपल ज्युस मध्ये भिजवायचे मग त्यात योगर्ट, वगैरे वगैरे... मला चक्कर यायला लागली. एक एक त्यातला इन्ग्रेडियंट खास कुठून कुठून आणायचा होता. साधा सुद्धा नव्हता. मग मीही ठरवले, बीइंग डाय हार्ड ऑप्टिमिस्ट,  आता मी माघार घेऊच शकत नाही. बर्ट्रांड रसेल म्युसेली बनवायचीच. कितीही कठीण असली तरी. 

मग जंग जंग पछाडत, मग रोलिंग स्टोन सारखे गोल उड्या मारत म्हंटले तरी चालेल, कोणी  रोल्ड ओट्स देता का रोल्ड ओट्स असे विचारात दुकानं च्या दुकानं फिरले. काही दुकानदार तर माझ्याकडे कोहिनूर हिरा आहे का विचारल्या सारख्या अविर्भावात बघत आश्चर्यचकित झालेले दिसले. मग काहींनी नॉन रोल्ड ओट्स दिले. जे मी नाकारले. मग finally होकारले सुद्धा कारण म्हणजे बघुयात तरी. तेही गणित चुकले. मग एका शुभ मुहूर्तावर मला रोल्ड ओट्स मिळाले. भिजवलं एकदाचं  त्यांना. मधल्या वेळात मग व्हर्जिन अँपल ज्युस शोधला. तोही कठीणच होता मिळायला. :) मग तिने मला सांगितले बॉक्स वर काय बघायचे मग ऑथेंटिक व्हर्जिन अँपल ज्युस मिळतो. तोपर्यंत मग कसे बसे एक्सपायरी डेट न गेलेले योगर्ट मिळवले. असे करत करत मी ही जे के रोलिंग सारखी हॅरी पोट्टर ची लेखिका ऑलमोस्ट झाले. जे के रोलिंग सारखेच माझ्याकडेही कॉन्ट्रॅक्ट नव्हते तेंव्हा हातात. :)

आता फक्त राहिले ते एक शेवटचे काम ते म्हणजे हे सगळे नीट पणे मिक्स करणे. त्यात खजूर आणि काही फळे तुकडे करून घातले. . जमली बाबा एकदाची- बर्षर म्युसेली. आयुष्याबद्दल खूप काही शिकवून गेली मला ही रेसिपी. :) हुश्श्य . पण आतापर्यंत माझ्यातली मिनिमलिस्ट आता जागी झाली होती. इनफ इस इनफ. 

हीच रेसिपी आपण सोपी करू शकतो का? मग मी धडाधड त्यातले सोप्पे मार्ग शोधले, बाहेरून गोष्टी न आणता घरच्या घरी आपण कसे सगळे बनवू शकतो, तीच टेस्ट आणून? सगळे आत्मसात केले मग मला finally चांगली झोप लागली. शिवाय रोल्ड ओट्स १० तास भिजवून ठेवावे लागत नाही ह्याचा ही मूलभूत रिसर्च मी केला. त्याचा soaking time ३० मिनिटांवर आणून मी प्रोसेस ऑप्टिमाइझ सुद्धा केली. :) मी आता होममेड बर्षर म्युसेली  एक्स्पर्ट झाले आहे. झोपेतही पेपर घाला. मी पास होईन. :) आणि हो बर्ट्रांड रसेल फिलॉसफया सारखी ती  कठीण राहिली नाही, नाऊ आय प्रौडली से  आय कॅन मेक बर्षर म्युसेली :)