मध्यंतरी एक विचार मनात आला.. स्वतःशी खरं असताना . आणि तसे मी ते नेहेमीच असण्याचा प्रयत्न करत आले आहे. पण काही वेळा आपण आपल्याशी प्रकर्षाने खरे असतो.
विचार आला विजेसारखा, मला एकाकी वाटतंय. त्या वेळी. मला खरोखरच एकाकी वाटतंय. फार सुंदर शब्द आहे ना? एकाकीपणा. एकटेपणा. एक जाणीव ज्या मध्ये आपल्याला अचानक लक्षात येतं की आपण एकटे आहोत. एकटे आलो ह्या जगात आणि एकटे जाणार ही, ह्या जगातून निघून. हे झालं निर्वस्त्र सत्य.. एकटे असणे .. म्हणजे अगदीच मूलभूत असं सत्य . की ज्यात कोणताही माणूस प्राणी पक्षी झाडे वेली फुलं, ग्रह तारे सूर्यमाला आणि त्याही पलीकडे एक अनंत अशी पोकळी.. एका निसर्गाच्या वर्तुळाप्रमाणे येणार आणि जाणार. अनादी अनंत कोटी वर्षे हेच चालू आहे आणि त्या सत्याचा आवाका देखील मोठा आहे म्हणजे व्याप्ती ..म्हणजे अगदी खगोलशास्त्रामध्ये देखील.. लांब लांब दिसणारे लुकलुकणारे तारे (का ग्रह?) हे देखील असंख्य खळबळजनक घडामोडींमधून जात असतात आणि एकटेच असतात. ते 'जिवंत असणाऱ्यांमध्ये' नसतील देखील पण तेही एकटेच लुकलुकत असतात. कधी कोणी दुसऱ्याचा प्रकाश घेतो कधी स्वतःचाच. पण ह्या सगळ्याच्या पाळामुळाशी गेलो तर हे खरेच आहे की आपण एकटे असतो.
कठीण आहे मानायला, झेपायला, पण तेवढेच कटू सत्य देखील. मग हा एकाकीपणा नक्की काय असतो? त्यात दुःख असतं का? तर हो. आपल्याला त्या वेळी तरी वाटतं कि आपण एकटे पडलोय आपल्या साथीला कोणी नाही...आपल्याला समजून घेणारं असं मैतर कोणी नाही .. वगैरे वगैरे असंख्य विचार दाटून येतात मनात आणि त्त्यांना दुजोरा द्यायला ही एक भावना एखाद्या लाटेसारखी बेभान येते.. एकाकीपणा ..
ह्याच लाटेला एक आल्हाददायक आणि आश्वासक ओहोटी आणणारा, दुसरा विचार किंवा भावना म्हणजे स्वमग्न असण्याची. ज्यात मग आपल्याबरोबर आपले आप्तेष्ट असतीलही. नसतीलही. त्यातही आपण एकटे असू शकतो पण तेंव्हा ही भावना खूप सुखकारक असते. एकाकीपणासारखी दुःखी नसते. आपण आपल्यात रमलेलो असतो. स्वमग्न असणं ..म्हणजे खुद में मुशगूल रेहेना..
पण एकाकीपणा आणि स्वमग्न असणं ह्यातली सीमारेषा फार धूसर आहे असे ही माझ्या लक्षात आले. आपण आव आणू शकतो की स्वमग्न आहोत आपण स्वतःमध्ये आनंदी आहोत, बेहोष आहोत..स्वतःमध्ये सामावलेले आहोत..पण तो कदाचित आतून एकाकीपणा असेल, स्वतःला मान्य न करणारा ?
खरं सांगायचं तर एकाकीपणा हा मान्यताप्राप्त नाहीच आहे. म्हणजे त्याला सामाजिक प्रतिष्ठा नाहीये :) म्हणूनच तर कोणीही बिचकेल .. ऐकून. किंवा बरेच से जणं स्वतःच मान्य करत नसल्यामुळे इतर कोणाचा एकाकीपणा ही मान्यच करू शकत नाहीत.. माझ्यातली सकारात्मक मी नेहेमीच सांगते मला, की हे तात्पुरतं आहे. एकाकीपणाची लाट येते, तशीच मनाला भरून येण्याची लाट देखील येते च की..
असे हृदयस्पर्शी क्षण ही येत असतात. आपल्या माणसांबरोबर सहज पणे भेटताना, कोणताही मुखवटा न घालून.. भरती च तर येत असते.. स्वानंदाची ओहोटी ही काही वाईट नसते..जरी वरकरणी स्वानंदी माणूस disinterested वाटला दिसला तरी तो स्वमग्न असतो .. तीरावरच्या सुख दुःखांची तमा त्याला नसते .. एखादा फकीर असतो ना तसं . किंवा संत कबीरांचे दोहे असतात तसं .. तो गाणं म्हणत असतो.. ऐकणाऱ्यांना आवडो नआवडो.. like करो वा न करो :)
तर हे सगळे भावनांचे खेळ ..म्हणूनच तर ह्यातल्या सीमारेषा धूसर आहेत. मी स्वमग्न आहे वेगळं आणि मला कधी तरी एकाकी वाटतं हे वेगळं . तेही खरं हेही खरं . त्या येणाऱ्या लाटा ही खऱ्या आणि जाणाऱ्या ही खऱ्या.. किनाऱ्यावर आदळणार्या देखील खऱ्या आणि निर्मनुष्य आणि गहिऱ्या अशा खोल महासागरात अस्पष्ट दिसणाऱ्या लाटा ही खऱ्याच. सगळे लाटांचे आणि भावनांचे मायाजाल..
हे सगळं लिहिता लिहिता मला आता एकदम लक्षात आलं की मला समुद्र, लाटा का आवडतात..:) कारण आपलं मन म्हणजे एखाद्या अनंत पसरलेल्या समुद्रासारखंच असतं..लाटा वेचायला गेलो तर हातात काहीच लागणार नाही. एकाकी काय, स्वानंद काय, प्रेम काय जिव्हाळा काय, राग काय लोभ काय.. कित्येकदा आपण ह्या सगळ्यांना शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयन्त करत असतो. कवी, कलाकार तर अजूनच जास्त .. पण बऱ्याचदा हे भाव फुलपाखरासारखे बघता बघता हवेत उडून जातात किंवा एखाद्या माशासाखी डुबकी मारून नाहीसे होतात.
तसे म्हंटलं तर प्रत्येकाला च साथ हवी असते ..समांतर विचार करणारी माणसं हवी असतात. समांतर ? समान नाही. कारण कोणीच एकसमान नसतं .. प्रत्येकालाच आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. प्रेम द्यायला व्यक्ती हवी असते. मग त्यात सगळ्या range मधले प्रेम हवं असतं, प्रेम द्यायचं ही असतं .. मग मैत्री असो प्रियकार प्रेयसी असो, नाती असोत, आपल्याबरोबर काम करणारी माणसं असोत , समाजाचा घटक म्हणून बरोबरची माणसं असोत, ओळखीची असोत किंवा अनोळखी असोत. माणूस तसा समूह्प्रीय प्राणी आहे आणि म्हणूनच त्याला एकटेपणा देखील आहे :) पु ल म्हणतात तसं ..एक शून्य मी पुस्तक मध्ये . कधीतरी माणसात असूनही किंवा नसूनही एकाकी पणा जाणवू शकतो किंवा जाणवतोच.. आपण जबरदस्तीने त्या भावनेला पुरून टाकून म्हणतो किंवा म्हणायचं प्रयत्न करतो की आपण स्वमग्न आहोत.. solitude मध्ये आहोत... पण अगदी खरं म्हणजे ते वरकरणी असतं. त्यावेळी तरी.
ह्या ही भावना खऱ्या आहेत त्याही खऱ्या.. आणि मग आपण हे ज्या क्षणी मान्य केलं, accept केलं, त्याच क्षणी आपण स्वतंत्र होतो. कोणापासून? स्वतःपासून..A true lib moment. सगळेच भाव मान्य करत जगणं .. मग तो एकाकी पणा ही का असेना? ..
ते भाव प्रामाणिक पणे आधी स्वतःशी मान्य करणं आणि मग जमल्यास आपल्या व्यक्तींपर्यंत पोचवणं ..
म्हणजेच जगणं ..काटा रुते कुणाला.. मज फूल ही रुतावे ..