काहीतरी कशातरी नव्याने परिवर्तित होणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. मला ह्या अशा वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मशन्स बद्दल फार आतमीयता आणि कुतूहल वाटत आले आहे. एखादी गोष्ट आधी वेगळ्या फॉर्म मध्ये असते मग नंतर ती आपोआप कालावकाश फॉर्म बदलते. अशा सगळ्या गोष्टींमध्ये एक अतिशय सुंदर आणि भावणारी गोष्ट म्हणजे अश्रूंची फुले होणे. खरे तर दोघांचा काही डायरेक्ट संबंध नाही. पण खूपश्या कविता आणि गोष्टींमध्ये अश्रूंची फुले होणे हे वाचनात येत गेले आहे. मग म्हणजे होते काय?
अश्रू खरं तर जास्त करून दुःख व्यक्त करतात... काहीतरी साचलेले असते मनात हे अश्रूंच्या माध्यमातून बाहेर येते.. ते एक कारण बनते निमित्त मात्र. साचलेले काहीतरी वेगळेच असू शकते पण त्याच वेळी ते व्यक्त होणे देखील महत्वाचे असते. अश्रूंना जर धरण घालून खूप जास्त किंवा कृत्रिमरीत्या रोखून धरले तर तेही मनासाठी चांगले नसते. वाटले, रडले व्यक्त झाले पुढे गेलो इतक्या सहजतेने रडणे झाले तर तसेच हसणे ही होऊ शकते असे मला वाटते. मी असे कित्येकदा बघते की जे खूप प्रयत्नपूर्वक अश्रू बंदिस्त करून ठेवतात त्यांना नंतर नंतर अथवा हळूहळू हसणेही कठीण जायला लागते..
म्हणजेच भावनांना अध्याहृत धरू नये.. हसू आणि आसू कदाचित शेजारी शेजारीच राहात असतील? आणि अश्रू देखील कधी दुःखाचे कधी आनंदचे देखील असतातच की? ह्या सगळ्यात अश्रूंची झाले फुले हा एक मेटॅमॉर्फोसिस आहे. म्हणजेच ते सुरवंट जसे खूप स्टेप्स मधून मोठे होत अचानक एके दिवशी सुंदरसे फुलपाखरू बनून उडून जाते तसेच अश्रू देखील कधीतरी रडत रडत अचानक एके दिवस सुंदर से हास्य बनतात तर कधी एक सुंदर शी अभिव्यक्ती बनतात तर कधी एखादे सुंदर से गाणे बनतात तर अशी कोणतीही कलाकृती बनतात...आणि दरवेळीच कलाकृती कशाला हवी? कदाचित एखादी छोटीशी मोकळे पण दिलेली दाद बनतात.. ज्या ज्या गोष्टींमध्ये मोकळे पणा आहे, सौंदर्य आहे ते बनतात आणि त्यांनाच कदाचित फुले म्हणत असतील??
No comments:
Post a Comment